राज्याच्या विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने हवामानात बदल होत असून, अचानक निर्माण झालेल्या ढगाळ वातावरणामुळे शेतकरी आणि बागायतदार कमालीचे धास्तावले आहेत. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यांचा वेग मंदावल्याने आणि अरबी समुद्रावरून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. ऐन थंडीच्या दिवसांत उकाडा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांवर कीड आणि रोगांचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली आहे.
रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यांत सध्या हापूस आंबा आणि काजूचा हंगाम सुरू होत आहे. झाडांना मोठ्या प्रमाणावर मोहर आला असून, त्याला पोषक थंडीची गरज असते. मात्र, ढगाळ हवामानामुळे आर्द्रता वाढली आहे. ढगाळ वातावरणामुळे आंब्यावर तुडतुड्यांचा हल्ला वाढण्याची दाट शक्यता आहे. बाष्पयुक्त हवेमुळे मोहरावर करपा आणि भुरी सारखे रोग पडू शकतात, ज्यामुळे मोहर काळा पडून गळण्याची भीती बागायतदारांनी व्यक्त केली आहे.



